लगेच धुंद गेली ,मी आरश्यासमोर आली ,
न्याहाळताना स्वतःला,चेहऱ्यावरची नजर मानेखाली गेली,
बघून जरा भीतीच वाटली,सणासुणाशिवाय कोणी तीथे ,
सिगरेटच्या टिपक्यांची ,दातांच्या पंक्तीची रांगोळी उमटवलेली,
म्हणतात मी ओरडत नाही,त्याची भूक भागवताना ,
हे मला चिमटे काढतात,श्वास माझे गुदमरताना,
बेअब्रू माझे कामुख शरीर ,झाकायचा प्रयत्न कापडांचा,
रांगोळ्या रोज ठणकायच्या,झाकायचे काय ?हाच मोठा प्रश्न,
धार पाण्याची शरीर धुवायची,लुटलेली इब्रत कापडं झाकायची,
होळी सारखी रात्रभर जळलेली मी ,निखारे मनाचे गिळत राहायची,
कोकरू होतं महिन्याचं,दुधासाठी जे रडायचं,
स्तनाजवळ तोंड लावून सुद्धा,बिचारं आकांताने तडफडायचं,
स्तनांत दुध कधी नसायचं,रात्रीचं जे वंगण बनायचं,
तान्हुला माझा मुकायाचा त्यालाच ,जे फक्त त्याचचं होतं,
भाकरीचे पीठ मळावं,स्तनांचंही काहीसं तसंच झालं,
माई फेसच का ग येतो,कोकरू विचारायचं अन् काळीज तुटायचं,
दुध माझ्या तान्हयाचं,कोणी दुसरंच चाटून जायचं ,
वासनेच्या त्या क्षणांत ,आईपण माझं वाहायचं,
वासराचं हंबरणं ऐकून,गाईचं काय होत असेल,
दुध काढून पिणाऱ्यांना काय माहित ?,भाव तो मातृत्वाचा ,
अंगावर नजर फिरवायची ,मनाचे धाडस झालेच नाही,
जखमांच्या गर्दीत कधी ,सुरक्षित तो भाग दिसलाच नाही,
नाही नशिबी संसार अन्,नाही ते त्याचे रमणे,
तुटलेली तार विणेची अन्, फाटलेल्या तबल्याचे भंगणे ,
वाटले आत्महत्या करावी ,पण कुणासाठी ?,शरम वाटते म्हणून करू का ?,
कोणाची या बेशरम्यांची!!,कि आणखी कोणाची,असे प्रश्न !!
असाच मी अंधार ,चंद्रालाही नको असलेला ,
चांदण्याना काय माहित,नशीब सुर्याचं काय ते ?,
प्रेमाची फुललेली रात्र,स्वर्गातले सुख म्हणे,
माझ्या पदरात रोज येते,मग दैव माझे असे कसे ?,
दिवसा मी माझ्यात नसते ,रात्री या जगात नसते ,
बेशुद्धीत मासकं सतवतात ,अन् शुद्धीत माणसं रगडतात,
मोठं होवून माझं पिल्लू ,काय करेल हा प्रश्नच आहे,
बाजारात बसेल स्वताः,नाहीतर मलाच बसवेल यात शंका नाही ,
असंच चालत चालत, चालत राहायचं ,
आयुष्य संपेपर्यंत ,चितेची आग तरी स्वताची असेल ही आशा ............
आणि ते भस्म सुद्धा थोडं तरी पवित्र असेल .........मी नसेन जिवंत म्हणून तरी कदाचित !!!!!!!
No comments:
Post a Comment